या अनुभवा नंतर आम्ही ठरवलंय की जमेल तितकं त्यांचं आयुष्य कॅमेऱ्यात कैद करयाचं आणि त्या फोटोंच्या आधारे केलेलं लिखाण त्यांना वाचायला द्यायचं. ज्यांना अजून लिपी परिचयात गोडी वाटत नाहीये त्यांना ही त्यांच्या स्वतःच्या गोष्टी लिहून दाखवायच्या. अशाप्रकारचे लिखाण वाचायला मिळाले तर या मुलांची वाचायला शिकायची गोडी वाढेल असा आमचा होरा आहे.
अकरा खरड्यात किती राख?
खरे तर राहुलला अजून पाढे येत नाहीत. पण स्वतःच्या विश्वातली समस्या समोर आली तर ती सोडवण्या इतपत संख्यांवर प्रभुत्त्व त्याने नक्कीच मिळवलंय. आता आमच्या समोर आव्हान आहे ते राहुलच्या स्वतःच्या लवचिक रीती पासून सुरुवात करून त्याला अधिक अमूर्त अशा आकडेमोडीच्या सर्वसामान्य रीती पर्यंत घेऊन जाण्याचं.
मोजच्या भट्टीवरून
राहुलच्या मदतीने मला आणि किशोरला या मुलांच्या जगाचे दार किलकिले झाले आहे.आम्ही ठरवलंय कि या जगात शिरायचं, शिक्षणशास्त्राचे भिंग वापरून त्यांचं जग निरखायचं आणि या मुलांना शिकवण्याची वाट शोधायची. आम्ही आमच्या प्रयत्नात यशस्वी होऊ की नाही हे आम्हाला माहिती नाही. पण हे नवं आव्हान आम्हाला दोघांना ही खुणावतय एवढं नक्की.